एका महिन्यात मुंबई, तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार - किरीट सोमय्या
एका महिन्यात मुंबई, तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार अशी प्रतिक्रिया भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. किरीट सोमय्या आज जालना दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बोगस जन्म प्रमाणपत्र संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आढावा बैठक घेतली.
मुंबईत आतापर्यंत 60 टक्के बेकायदेशीर भोंगे खाली उतरवण्यात आले असून एका महिन्यात मुंबई, तर दोन महिन्यात महाराष्ट्र भोंगे मुक्त होणार असल्याचे सोमय्या यांनी म्हंटले आहे. दरम्यान, जालन्याच्या अंबड तालुक्यात 1 हजार 760 जन्म प्रमाणपत्र खोट्या पद्धतीने नायब तहसीलदारांनी दिले असून, जिल्ह्यातील एकूण 3 हजार 595 प्रमाणपत्र परत घेतले जाणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील बाकी तहसीलदारांनी दिलेल्या प्रमाणपत्राची देखील चौकशी करण्यात येणार असल्याचं सोमय्या म्हणालेत. राज्यात आणि देशात विरोधी पक्षातील नेत्यांचे भोंगे 4 महिने सतत वाजत आहेत. त्यांचे भोंगे वाजू द्या, पण राज्यात बेकायदेशीररित्या मशीदिंवर एकही भोंगा वाजू देणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./