"चेन्नई पॅटर्न" च्या नावाखाली जनतेची लूट, शिवसेना ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नव्या कचरा संकलन पद्धतीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार टीका केली आहे. 'चेन्नई पॅटर्न' च्या नावाखाली नागरिकांच्या खिशावर लूट सुरू असल्याचा आरोप करत, पक्षाने पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील कचरा संकलनाच्या नवीन "चेन्नई पॅटर्न" विरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने कल्याणमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेचे नेतृत्व कल्याण जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केले. या पत्रकार परिषदेत बोलताना म्हात्रे यांनी स्पष्ट केले की, नवीन कर प्रणालीमुळे सामान्य नागरिकांवर ५०% पर्यंत करवाढ लादण्यात आली आहे. पूर्वी वार्षिक ₹६०० कर भरणाऱ्या नागरिकांना आता ₹९०० पर्यंतचा कर भरावा लागणार आहे. सर्वांवर एकसमान कर लादला गेला असून, ही जनतेच्या खिशावरची सरळसरळ लूट असल्याचा आरोप करण्यात आला. कचऱ्याच्या संकलनासोबतच प्रक्रिया न करण्याच्या निर्णयावरही पक्षाने नाराजी व्यक्त केली. सध्या शहरात दररोज सुमारे ८५० टन कचरा निर्माण होतो. पण उंबर्डे, बारावे आणि डोंबिवली येथे लवकरच सुरू होणाऱ्या प्रकल्पांची मिळून केवळ ६५० टन प्रक्रिया क्षमता आहे. त्याशिवाय, दुर्गाडी किल्ल्याजवळ गेल्या अनेक वर्षांपासून १०,००० मेट्रिक टन कचरा साचलेला असून तो अद्याप तसाच आहे.
शिवसेनेने आरोप केला की, ठेकेदारांची नावे बदलली जातात – अँथोनी, आरबीएल, सुमित – पण कामाच्या दर्जात कोणताही फरक नाही. सत्ताधारी पक्ष जनतेला फसवत आहे आणि अपारदर्शक पद्धतीने निर्णय घेत आहेत. शहरातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, काँक्रीट रस्त्यांची रखडलेली कामे, चोकअप झालेल्या मलवाहिन्या, नवीन ठेकेदारांची गैरहजेरी या समस्यांवर देखील शिवसेनेने जोरदार टीका केली. पावसाळा तोंडावर असताना देखील प्रशासन गंभीर नसल्याची टीका त्यांनी केली. शिवसेनेच्या वतीने आयुक्तांना इशारा देण्यात आला की, जर प्रशासनाने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडेल. सर्वसामान्य जनतेने वाढीव कराचा निषेध करावा आणि आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./