सुरु झाला कंडक्टरचा शोध, त्याला मिळणार, अडीच एकरशेत, अडीच तोळे सोने आणि बरच काही...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सुरु झाला कंडक्टरचा शोध, त्याला मिळणार, अडीच एकरशेत, अडीच तोळे सोने आणि बरच काही...




सुरु झाला कंडक्टरचा शोध, त्याला मिळणार, अडीच एकरशेत, अडीच तोळे सोने आणि बरच काही...
    
ही कथा आम्ही लिहिलेली नाही, ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पण कुणी लिहिली याचा उल्लेख नाही, लेखकाने नाव कळवले तर नक्कीच नाव प्रकाशित करु. ही कथा सर्वांना प्रेरणादायी ठरावी, हिच एक अपेक्षा.

मुंबई : रात्री बराच वेळ झाला होता. देवगडला जाणारी शेवटची बस  वेळ होऊनही सुटत नव्हती. बस स्थानक तसे संपूर्ण रिकामे झाले होते. दोन चार प्रवाशी  इकडे तिकडे रेंगाळत होते. या बसचे दहा बारा प्रवाशी मात्र तळमळ करीत होते की बस अजून का सुटत नाही....
तेवढयात एकाने निरोप आणला की बसचे एक चाक पंक्चर आहे. तो काढला की गाडी सुटेल. बरोबर दहा वाजता बस निघाली. जवळ जवळ सर्वच प्रवाशी देवगडला जाणारे होते.

एका हातात बोचके धरुन बसलेल्या म्हातारी जवळ मात्र जेव्हा वाहक तिकीट फाडण्यास आला तेव्हा रस्त्यावर कातवन फाटा असलेल्या आणि तेथून तीन चार किलोमीटर दूर असलेल्या गावाचे तिकिट मागू लागली.

बस वाहक विचारात पडला. या म्हातारीचे वय झालेले, एकटीच उतरणारी, पावसाळ्याची गर्द अंधारी रात्र ही म्हातारी घरी कशी पोहचेल?

तो थोडासा म्हातारीवर रागावलाच की, ‘तु एकटी, तुला नीट दिसत नाही, चालता येत नाही, एवढा उशीर का केला ? लवकर उजेडात निघून जायचे ना ?’

म्हातारीला नीट ऐकु पण येत नव्हते. काही तरी उत्तरतीने दिले. वाहकाने तिला त्या गावाचे तिकिट दिले व आपल्या स्थानावर येवुन बसला.


इतर प्रवाशी पेंगुळले होते. चालकाने दिवे बंद केले. वाहक मात्र म्हातारीचा विचार करीत होता. त्या फाट्यावर तर आपण तिला उतरुन देवू पण धड चालता न येणारी, व्यवस्थित रस्ता न दिसणारी ही म्हातारी तीन, चार किलोमीटर या पाणी पावसाच्या दिवसात घरी कशी पोहचेल ?

रस्ता खाचखळग्यांनी व खड्डांनी भरलेला, मध्ये एखादा नाला वाहत असेल तर ? कुत्रे किंवा एखादया प्राण्याने या म्हातारीवर एकटे पाहुन हल्ला केला तर ?

तेवढयात म्हातारी उतरणार होती त्या गावचा फाटा आला. वाहकाने घंटी वाजविली. चालकाने बस थांबविली.

वाहक उठला आजीबाईचे बोचके एका हातात व दुसऱ्या हातात तीचे बखोटे धरून तिला गाडीखाली उतरण्यास मदत केली. थोडा त्रागाही केला.

बाहेर डोळयांना काहीही दिसत नव्हते. त्याने ते बोचके डोक्यावर घेतले आणि म्हातारीचे परत बखोटे धरून चालायला लागला तो एकाच विचाराने की म्हातारीला एकटे न सोडता घरापर्यंत सुरक्षित घरी पोहचविणे.


म्हातारीलाही नवल वाटले. शक्य तेवढे ती ही त्याच्या पाऊलांबरोबर पाऊल टाकू लागली.

इकडे बस चालक व प्रवाशींची ‘दहा पंधरा मिनिटे झाली हा वाहक गेला कुठे ?’ अशी काव काव सुरु झाली. चालकाने बसखाली उतरुन बसला फेरी मारली की चक्कर वगैरे येवून पडला की काय ? नंतर त्याच्या लक्षात आले की तो त्या म्हातारीला सोडायला गेला असेल. संताप झाला त्याचा.

प्रवाशीही संताप करु लागले. अशा निर्जनस्थळी बस सोडुन हा निघून गेला. काही म्हणाले ‘चला हो, त्याला राहु द्या’ वगैरे वगैरे.

इकडे म्हातारीने त्या वाहकाला विचारले, ‘बा तुझे नांव काय रे ?’

‘तुला काय करायचे आजी माझ्या नांवाशी… मी महादू वेंगुर्लेकर.’
‘कोणत्या डेपोमध्ये आहे?’
वाहक- ‘मालवण.’
आजी – ‘मुलेबाळे?’
वाहक- ‘आहेत दोन.’

तेवढयात आजीचे पडक्या अवस्थेतील जीर्ण घर आले. दोन चार कुत्रे भुंकत पळाले. वाहकाला म्हातारीने कुलुपाची किल्ली दिली. त्याने कुलुप उघडुन दिले व तसाच धावत पळत बसच्या दिशेने माघारी पळाला.




ती म्हातारी त्या घरात व गांवात एकटी राहत होती. तिला जवळचे म्हणुन कोणीच नातेवाईक नव्हते. तिच्यावर प्रेम करणारे चौकशी करणारे काळजी करणारे असे कोणीही तीच्या आजुबाजुला फिरकत नसे.

ती ही फारशी मग कोणाच्या जवळ जात नसे. कोणी जवळ येण्याचा प्रयत्न केला की तीला वाटायचे, हा स्वार्थी आहे. याचा माझ्या इस्टेटवर डोळा आहे. ते वयोमानानुसार तिला वाटणे स्वाभाविक आणि सहजही होते.

गांवा लगतच ज्याला ग्रामीण भाषेत पांढरी म्हणतात तसे चार बिघा शेताचे तुकडे तिच्या मालकीचे होते. ते दरवर्षी कोणास तरी पेरण्यास देऊन त्या मोबदल्यात पैसे घेवुन आपला उदरनिर्वाह करायची.

असेच एक दिवस म्हातारी थोडी जास्तच आजारी पडली. तिने गांवचे सरपंच व ग्रामसेवक यांना बोलाविणे पाठविले. त्यांनाही म्हातारीने असे अचानक का बोलाविले म्हणुन नवल वाटले.
ते घरी आले.

म्हातारी उठून बसली व त्यांना म्हणाली, “दादा कागद काढा. हे दोन अडीच तोळे सोने, माझी पांढरी व हे घर महादू वेंगुर्लेकर, कंडक्टर, याच्या नावावर लिहुन द्या व हे वीस हजार रुपये जमविले आहेत त्यातुन मी मेल्यावर क्रियाकर्म करा. मी जास्त दिवस काही जगणार नाही”

सरपंच व ग्रामसेवक अबोल झाले. काय भानगड आहे, कोण हा महादू वेंगुर्लेकर कंडक्टर ? त्याला सर्व म्हातारी का देतेय ? असेल काही नाते असा विचार करून त्यांनी म्हातारीचा निरोप घेतला.
दोन तीन दिवसात म्हातारी वारली.

सरपंच व ग्रामसेवकाने तिच्या सांगितल्या प्रमाणे सर्व क्रियाकर्म पार पाडले. सर्व आटोपल्यावर मग त्यांनी महादू वेंगुर्लेकर कंडक्टरचा मालवण बस स्थानकावर शोध घेतला. त्याला भेटुन सर्व वृत्तांत सांगितला.

साधारण वर्षभरापूर्वीचाच बस मध्ये घडलेला प्रकार असल्यामुळे त्यालाही ते सारे आठविले. म्हातारीने त्याच्यासाठी केलेले ऐकुन तर त्याला रडूच कोसळले.

त्याने ती सर्व घटना सरपंच व ग्रामसेवकाला सांगितली. त्यांना नवलही व आनंदही वाटला. त्यांनी वाहकाला ठरल्या तारखेला त्या गांवी येण्याचे आमंत्रण दिले.

वाहक महादू वेंगुर्लेकर गावात आले तर शेकडो ग्रामस्थ जमलेले. सरपंचाने त्यांच्या गळ्यात फुलाचा हार घातला. वाजतगाजत त्याला गांवाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नेले.

तेथे सर्वजन विराजमान झाल्यावर तो शेताचा व घराचा नावावर करण्याचा कागद व म्हातारीने दिलेले अडीच तोळे सोने त्याच्या समोर ठेवले.

महादू वेंगुर्लेकरच्या डोळ्यातुन अश्रुच्या धारा लागल्या.

मी केलेल्या एका छोटयाश्या मदतीची म्हातारी एवढी किंमत देवुन गेली. त्याला काहीच सुचत नव्हते.

बाजुलाच मुलांचा गलका त्याला ऐकु येत होता. त्याने विचारले, ‘येथे शेजारी हायस्कुल भरते का?’

सरपंचाने, ‘हो, शाळेला स्वतःची जागा व इमारत नाही. त्यामुळे कातवन ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तोडक्या मोडक्या खोल्यांमध्ये वर्ग भरतात.’ असे सांगितले.

वाहक म्हणाला,’का?गावठाणची जागा किंवा जवळपासच्या एखाद्या शेताचा तुकडा नाही का कोनी देत शाळेसाठी?’

सरपंच म्हणाले, ‘गांवठाणची जागा नाहीच व शेत देण्यास कोणीच तयार होत नाही.’

वाहक महादू वेंगुर्लेकर ताडकन खुर्चीवरुन उठले व टेबलावरील शेताचा कागद सरपंचाला देत म्हणाले, “हे घ्या शाळा बांधण्यासाठी शेत.

हे घर पण विक्री करा. त्यातून येणारे पैसे बांधकामाला वापरा आणि हे सोने हे विकून शाळेला छान दरवाजा बांधा व त्यावर म्हातारीचे सुंदर नांव टाका”

टाळ्यांचा कडकडाट झाला. सरपंच व ग्रामस्थ भारावुन गेले. “दरवाज्यालाच काय हायस्कुलला म्हातारीचे नांव देवू”

वाहक महादू वेंगुर्लेकर यांनी त्यांचे आभार मानुन निरोप घेतला. त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे सारा गाव बघतच राहिला.

झोळी फाटकी असुन सुद्धा गांवाचे सारे काही तो गांवालाच देवुन गेला होता व एक प्रकारे त्या म्हातारीच्या नावाला अमर करून गेला.

एखाद्याला केलेली छोटीमोठी मदत कधीही वाया जात नाही. त्याच्या काळजात ती घर करुन जाते. समोरचा कृतघ्न झाला तरी चालेल पण आपण मदत करण्याचा स्वभाव कधीच सोडू नका.

माणसाने माणसांशी माणुसकीने वागावे हे विस्मृतीत जाऊ नये म्हणून अशा पोस्ट परत परत एक मेकांना पाठवत राहू. पोस्ट आवडली तर पुढं पाठवा...

सूचना – ही कथा आम्ही लिहिलेली नाही, ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, पण कुणी लिहिली याचा उल्लेख नाही, लेखकाने नाव कळवले तर नक्कीच नाव प्रकाशित करु. ही कथा सर्वांना प्रेरणादायी ठरावी, हिच एक अपेक्षा.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई.