KOKAN: गणपती उत्सव कोकण प्रमाणे देशावर आपण केला तर तुमचे कुटुंब संस्कृती अजून मजबूत बनेल...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

KOKAN: गणपती उत्सव कोकण प्रमाणे देशावर आपण केला तर तुमचे कुटुंब संस्कृती अजून मजबूत बनेल...



KOKAN: 
लोकसंदेश प्रबोधन वार्ता 

गणपती उत्सव कोकण प्रमाणे देशावर आपण केला तर तुमचे कुटुंब संस्कृती अजून मजबूत बनेल...

कोकणातील मंडळी आपणास देशावरली मंडळी संबोधतात. मी तिथे जावून, गणपतीत पाच दिवस कोकणात कुडाळला मित्राकडे राहून हा अनुभवाने लेखक 
डाँ अशोक गार्डे यांनी लिहलेला आहे.


कोकणात आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो. आई-वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई-वडिलाच्या घरात राहतो फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.


नोकरीच्या निमित्ताने चार भावाची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी मुळ घरातच गणपती एकच बसवतात व सर्व भाऊ व त्यांची बायका, मुले तिथे एकाच चुलीवर, दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात. भावा-भावात कितीही भांडणे किंवा वैर असले तरी या दहा दिवसात एकत्र राहणे, एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे हा कडक नियम आहे.



असे गणपतीमुळे एकत्र आल्याने कधी-कधी जुने भावातील वाद एकत्र आल्याने मिटले जातात. नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे, भांडण करणे व्यर्ज असते नाहीतर देवाचा कोप होईल या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात. मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.



कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर, संपूर्ण गावं भरून जातं. आपुलकीला उधाण येतं. माणसं एकत्र येतात, भेटतात, बोलतात आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात..!



गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची, पाऊलांची दाटी, दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं, गुण्या-गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं... पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक, दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा, तुम्ही राहू द्या, मी करते असा एका जावेने, दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा-गावात, घरा-घरात पहायला मिळते.



    मित्रहो, त्यामुळे पूर्वजांना नाव ठेऊ नका. ते आर्थिकदृष्ट्या गरीब होते पण मनाने श्रीमंत होते. सुशिक्षित नसतीलही पण नम्र होते. एखाद्या वेळेस रागवत असतील पण आजच्यासारखे डुख धरून रहात नव्हते. ते फॉरेन रिटर्न नव्हते परंतू एखाद्या वादाच्या प्रसंगी नेमकं कुठून आणि कोणी माघार घ्यायची, हे त्यांना चांगलं कळत होतं...


     योग्य वेळी, योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं, हे सर्व आपल्याकडे प्रेम, माया संपत चालली आहे. एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही. एका आई-वडिलाची मुले पण  द्वेष, मत्सर वाढत चाललाय. त्यांने मोटारसायकल घेतली की, लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही देशावरची परिस्थिती आहे.


    दुसऱ्या भावाला मदत करायची नाही या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे. आपल्याच आई वडिलाचा विसर पडलेला आहे तर मग गावटगे बसलेत तुमच्या काडी लावायला व सर्रास भाऊ याला बळी पडतात. संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत तर तिच्याकडे बघत पण नाहीत. काय मागते ते द्या ना. बहीण, भावापुढे कसला स्वार्थ धरता रे? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी भांडता, हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे. सुधरा, नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही पण तिथे सुद्धा तुम्हाला जागा मिळणार नाही...



   कोकणासारखे वागून बघा. कोकणात एकाही शेतकऱ्यांने आत्महत्या केली नाही. तिकडे पाच एकर म्हणजे मोठा शेतकरी, नाहीतर एकर, अर्धा एकर क्षेत्र त्यामुळे ते मुंबई पोटासाठी जवळ करतात.* आमचा दहा एकरवाला आत्महत्या करतोय त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही व रात्री मुड बनला की, घेतला फास...



   साधेपण जपा, कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून एकाच्या घरी दरवर्षी दहा दिवसाचा सण साजरा करा. गौराई बसवता तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करता तसे आपल्याच मातेच्या बहिणीचा पाहुणचार करा. जीवंत आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा तुम्हाला एकत्र पाहून आनंदीत होईल , ही भोळी अपेक्षा जरी असले तरी प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावा-बहिणीचे एकमेकाला चांगले आर्शिवाद मिळतील, यात तिळमात्र शंका नाही...

लेखक : डाँ अशोक गार्डे....

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली