शु..... शांतता .....सांगली चालू आहे.......

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

शु..... शांतता .....सांगली चालू आहे.......




               सांगलीचे विमानतळ बंद आहे.....

*सांगलीचे मंजूर ड्रायपोर्ट कोल्हापूर जिल्ह्यात गेले.....*
*मिरजेत मंजूर झालेला रेल्वे कोच कारखाना लातूरला गेला.....*
*आता सांगली रेल्वे स्टेशनचा रू १९० कोटीचा विकासही गुंडाळला गेला........*
*सांगली जिल्ह्याला सलग चौथा जोरदार फटका बसला.....*


*सांगली करू चांगली* ची घोषणा करणार्या प्रधानमंत्रींनीच सांगलीची ही दयनीय अवस्था बघावी.....

*रु ५००० कोटीच्या पुणे-लोंढा रेल्वे दुपदरीकरण व विद्युतीकरण प्रकल्पात सांगली रेल्वे स्टेशनला ठेंगा*

*रू १९० कोटीची विकासकामे सांगली रेल्वे स्टेशनला गमवावी लागली*

*सांगली रेल्वे स्टेशन सलाहगार समिती मौन*

*सांगली रेल्वे स्टेशन अनाथ*
सांगली रेल्वे स्टेशनला दतक घेऊन विकसित करू असे ८ वर्ष आधी म्हणणारे एक मोठे नेते कधी सांगली रेल्वे स्टेशनवर फिरकतच नाहीत

सांगली ता २७-फेब्रूवारी-२०२३
पुणे-लोंढा रेल्वे मार्गावर पुणे व मिरज हे दोन स्टेशनच पूर्णपणे विकसित आहेत. पुणे व मिरज ह्या दोन स्टेशनवर ६ प्लॅटफॉर्म, लिफ्ट, रिटायरिंग‌ रूम, टर्मिनल, पिट लाईन, पार्सल बुकींग ईत्यादी सर्वच सुविधा उपलब्ध आहेत.

पुणे-लोंढा रेल्वे मार्गावरील जिल्हा मुख्यालय व महानगरपालिका असलेले सांगली व बेळगाव हे दोन रेल्वे स्टेशन अविकसित असल्याने सांगली रेल्वे स्टेशन विकसित करण्याची जबाबदारी मध्य रेल्वे व बेळगाव रेल्वे स्टेशन विकसित करण्याची जबाबदारी रेल्वे बोर्डने दक्षिण पश्चिम रेल्वेकडे सोपवली होती.

त्यापैकी दक्षिण पश्चिम रेल्वेने सुंदर आराखडा तयार करून रू १९० कोटी खर्च करून बेळगाव रेल्वे स्टेशनचा कायापालट केला. यामध्ये स्टेशनची सुधारीत ईमारत, लिफ्ट, सरकता जिना(एस्कलेटर), दोन मोठे नविन प्रवेश द्वार, रिटायरिंग रुम, रेस्टोरंट, प्रशस्त पार्कींग बरोबरच रेल्वे कोचिंग टर्मिनल, पिट लाईन व गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सुविधा बेळगाव स्टेशनवर देण्यात आली आहे. १ वर्षात हे सर्व काम बेळगाव स्टेशनवर पूर्ण झाले आहे.

मात्र मध्य रेल्वेने सांगली रेल्वे स्टेशनचा कोणताही आराखडा किंवा रिमोडेलिंग न करता विद्युतीकरण पूर्ण केले. आता दुपदरीकरणही पूर्ण होण्यास आले आहे. तरीही मध्य रेल्वेने सांगली रेल्वे स्टेशनचा सुधारीत आराखडा किंवा डिझाईन प्रसिद्ध केला नाही. असे कळते की फक्त एक नविन प्लॅटफॉर्म बांधून सांगली स्टेशनचे दुपदरीकरण गुंडाळण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेकडून सुरू आहे. वास्तविक बेळगाव प्रमाणेच जिल्ह्याचे मुख्यालय, महापालिका व जगातील हळदीची मुख्य बाजारपेठच्या नजीक असलेल्या सांगली स्टेशनचा रू १९० कोटीचा आराखडा मध्य रेल्वेने पाठवायला हवा होता. पण तसे झाले नाही. पुणे शहरातील हडपसर व शिवाजीनगर हे दोन रेल्वे स्टेशन विकसित करण्यामध्येच सांगलीचा निधी वापरला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. वास्तविक पुणे-लोंढा प्रकल्प हा पुणे स्टेशन वगळून सांगली, बेळगाव मार्गे होता. त्यामुळे तो निधी पुण्यासाठी नव्हता. पण ह्याचे जाब कुणीच विचारत नाही.

सांगली रेल्वे स्टेशन सल्लाहगार समितीसह सर्वांचेच या बाबतीत दुर्लक्ष असल्याने सांगली‌ स्टेशनचा रू १९० कोटीचा विकास बुडाला आहे.

आता फक्त एक नविन प्लॅटफॉर्मवरच सांगली शहराला समाधान मानावे लागणार आहे.

*रू ५००० कोटी प्रकल्पातील मुख्य जिल्ह्याचे ठिकाण असून देखील सांगली रेल्वे स्टेशनला त्रृतीय कक्षेच्या सुविधांवरच समाधान मानावे लागणार आहे.*

विमानतळ नाही, हायवे शहरापासून ५० किलोमिटर अंतरावर आहे. फक्त रेल्वे स्टेशन सांगली शहराच्या मध्य भागात असून देखील भविष्याच्या दृष्टीकोनातून नियोजन व विकास नसल्याने सांगली स्टेशन असून नसल्यासारखे होणार‌ आहे.

सांगली रेल्वे स्टेशनवर ८ जणांची रेल्वे सलाहगार समिती नेमण्यात आली आहे. ह्या समितीने सांगली स्टेशनवरून नविन गाड्या सुरू करणे, सांगली मार्गे जाणार्या सर्व रेल्वे गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा देणे, पार्सल बुकींग सेवा सुरू करून घेणे, स्टेशनचे प्रवासी गाड्यांचे उतृपन्न वाढवणेसाठी सल्लाह देणे, स्टेशनचे रिडेवलपमेंट करून नविन सुविधा निर्माण करणे तसेच मुंबई-पुणे येथील मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्यांना भेटून वरील प्रश्न सोडवणे ही जबाबदारी आहे.

तसेच वेळ पडल्यास रेल्वे मंत्रीना भेटून सांगली रेल्वे स्टेशनचे प्रश्न सोडवणे ही देखील रेल्वे स्टेशन सल्लाहगार समितीची जबाबदारी आहे.

पण तसे होताना दिसत नाही. आपण फक्त रेल्वे सल्लाहगार समितीचे सदस्य असल्याचा देखावा करून स्वत:चे सम्मान वाढवणे व प्रत्येक सल्लाहगार समिती बैठकित चहा/कॉफी, बिस्कीट खाऊन परत जाणे हेच होत आहे.

अशा सल्लाहगार समिती बैठकीत फक्त दोन सदस्यांनी सांगली स्टेशनवरून नविन गाड्या सुरू करणेबाबत आग्रहाची भुमिका घेतली आहे. बाकी सर्व मौन आहेत.

प्रचंड मोठा निधी असूनही पुणे रेल्वे विभागाने सांगली रेल्वे स्टेशनचा विकास होऊ दिला नाही व सल्लाहगार समितीही गप्पच आहे. रु ५००० कोटी पैकी ४ टक्के निधी देखील सांगली स्टेशनवर खर्च झाला नाही. सांगली जिल्ह्याचे प्रचंड मोठे नुकसान झाले. जर सल्लाहगार समिती गप्पच बसणार‌ असेल तर सांगली जिल्ह्यातील लोकानीच आता रेल्वे प्रशासनाला जाब विचारायला हवा.


देशभर प्रचंड विकास होत असताना सांगलीलाच अविकसित ठेवले जात आहे.

सांगलीकरानी सांगली रेल्वे स्टेशनवर जाऊन तक्रार व विरोध करावा हे आवाहन आहे.

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई सांगली.
______________________________________________________

संपादकीय,
 सतीश साखळकर साहेब ,सांगलीसाठी आपली जी तळमळ आहे ती  वाखाणन्याजोगी आहे .."मला काय करायचे"अशा प्रवृत्तीचे जर सांगलीकर नागरिक असतील तर त्याला इलाज नाही...


सांगली फार जुनी वसाहत ,राजेशाही सरकार असलेली सांगली.
मुघल आले ,त्यानंतर इंग्रज आले ,त्याच्यानंतर राजे आले आणि हे सर्व निघून गेले... कालांतराने सांगलीने हळूहळू आपले पाय पसरायला सुर केले.. सांगली बरोबर मिरज कुपवाड देखील जोडलं गेलं

परंतु सांगलीला एक शाप आहे . तो म्हणजे राजकारणाचा.....

कोल्हापूर शहरामध्ये अनेक वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे विचाराचे राजकारणी, संघटना संस्था व माणस आहेत परंतु कोल्हापूरच्या प्रगतीसाठी ही सर्व मंडळी एकत्र येऊन लढा देत असतात ..असा... विषय सांगलीमध्ये नाही
 
सांगली देश स्वतंत्र झाल्यानंतर राजेशाही गेली.. आणि या लोकशाहीमध्ये काही काळ सांगलीची प्रगती झाली देखील ... जसे साखर कारखाना ,एमआयडीसीची निर्मिती ,औद्योगिक विकासाची निर्मिती, व छोटा का असेना विमानतळ ,अशी ध्येय धोरण व सांगलीच्या फायद्याच्या योजना त्या काळात राबवल्या गेल्या त्याच्यानंतर मात्र...  .....अलीकडच्या काळात  
सांगली शहरासाठी कोणतीही "आस्था" नसलेल्या राजकारण्यांनी सांगलीचा फक्त वापर करून घेऊन आपली सत्ता शाबूत कशी राहील याच्याकडे लक्ष दिल्यामुळे सांगलीची ही दैना झालेली आहे....


खरं पाहायला गेलं तर सांगली "महापालिकेच्या" लायकीची त्यावेळी पण नव्हती  ..आज देखील नाही. . मात्र अण्णासाहेब डांगे यांनी आपल्या राजकारणातून सांगलीला महापालिका केली .. परवा त्यांचा एक लेख वाचला .. त्यांनी असं लिहिलं होत...
 की सांगलीसाठी आम्ही काहीतरी चांगलं करायचं म्हणून आम्ही महापालिका केली... "अण्णासाहेब" तुम्ही काय चांगलं वगैरे काय करणार नव्हता  ...मदन पाटलाच्या राजकारणा मधून तुम्ही सांगलीची महापालिका सांगलीकर लादली  हे सर्व ज्ञात आहे...

त्यामधून सांगली मिरज कुपवाड महापालिकेची एकत्रित करून सांगलीकरांच्यावर कराचा बोजा लावून आपण इस्लामपूरला निघून गेलात.....

आणि सांगलीकर नागरिक आपण केलेल्या उद्योगाचा भोग भोगत आहेत    असो.. काळाचा महिमा सांगलीकरांचं दुर्दैव..

आज देखील राजकारण्यांचा विषय वेगळा नाही ..जो तो  .आपल्या गावातून येऊन सांगली आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो ..एखादं घर घेतो.. येथेच राहतो .. मग इथे पिल्लावळ तयार करतो आणि आपला हेतू साध्य झाल्यानंतर परत आपल्या गावी निघून जातो...
 परंतु त्यांना सांगली बद्दल  कोणतीही "आस्था" नाही.. कोणत्याही शहराला त्याच्या प्रगतीसाठी रस्त्याचे कनेक्टिव्हिटी, जसे नॅशनल हायवे, विमानतळ, ड्रायफूट, एमआयडीसी, व इतर उद्योग जे आपल्या शहरातील व आसपासच्या लोकांना उद्योग देऊ शकतील . अशी कोणतीही सुविधा सांगलीसाठी नाही

 कोणत्याही राजकारण्याने  स्टेजवरून घेऊन सांगावे की, आम्ही या सांगलीमध्ये या  पंधरा-वीस वर्षे यामध्ये हे हे प्रगतीचे काम केलेलं आहे...

मध्ये तर सांगली मध्ये आयुक्त आले.  ... बरमोडा घालून  कुत्रे घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या बरोबर  ..त्यांनी चार भिंती रंगवल्या.  या कॉन्ट्रॅक्टर लोकांना सांगलीकरांच्या बाबतीत यांना फार प्रेम वगैरे असं काही नव्हतं... पण आम्ही सांगलीकर यांच्यासाठी फार मोठं काहीतरी करत आहोत..

असल्याचं दाखवून  . सांगलीच्या मोठे मोठे प्लांट्स व मोठ्या मोठ्या इमारती बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या पदरात पाडून घेऊन या माध्यमातून ही लोक मोठी झाली . व आयुक्त साहेबानी चमकोगिरीच केली व ते निघून गेले

सर्व राजकारण्यांनी फक्त सांगलीला टिशू पेपर सारखा वापर केला आहे... हे लोक मग ते कोणत्याही पक्षाचे असोत..  त्यांनी फक्त सांगलीचा फायदा करून घेऊन टिशू पेपर टाकल्यासारखे टाकून निघून जातात व निवडणुका आले की ही लोक चमकतात...
त्यांच्या राजकारणामध्ये सांगलीकरांची फार मोठी दैना व ससेहोलपट होत आहे... सांगलीकर नागरिक एखाद्या 1000 स्क्वेअर फुटाच्या स्वतःच्या घरात आरसीसी बिल्डिंगमध्ये राहत असेल तर.... तो आता भाड्याने राहत आहे.... याचं कारण असं आहे की,महापालिकेमुळे त्याच्यावर घरपट्टी, पाणीपट्टीचा  कराचा बोजा आहे... तो स्वतःच्या घरात भाड्याने राहिल्या सारखा इतका आहे... इतका कर व पाणीपट्टी या लोकांनी बसवून ठेवलेली आहे  .

"मला काय करायचे '' अशा प्रवृत्तीचे सांगलीकर असल्यामुळे हा कर व पाणीपट्टी गप गुमान भरतात. .
परंतु आम्ही महापालिकेचे कर भरतो मात्र त्याच्यातील महापालिकेला त्यांनी दिलेल्या सुविधा विषयी जाब विचारण्याची ताकदच आता सांगलीकरामध्ये राहिलेली नाही..

आम्ही  लेखात वारंवार असं म्हणत असतो की,  सांगलीची "नगरपालिका करा" मिरजेची वेगळी व कुपवाडची वेगळी करा असं प्रावधान कायद्यामध्ये आहे

 यासाठी सांगलीकारांनी उठाव करून सांगलीची लायकी नसताना  नागरिकांवर लादली गेलेली महापालिका  झुगारून लावण्याचे काम सांगलीकर नागरिकांनी कराव...

या मध्ये कोणताही राजकारणी नेता,आमदार ,खासदार हा प्रस्ताव कधीही सरकार दरबारी मंत्रालयात मांडणार नाहीत , त्याचं कारण असं की, त्यामुळे त्यांची पोळी भाजली जात नाही...
 
सांगली हे खेड्याचच दुसरं रुप आहे , इथे कोणतेही उद्योगधंदे ,मोठे प्रकल्प, रस्ते, विमानतळ किंवा उद्योगासाठी लागणाऱ्या सुविधा नाहीत त्यामुळे बाहेरील उद्योग , व्यापारी व गुंतवणूकदार ,सांगलीमध्ये येण्यासाठी तयार नाहीत..

                "सांगलीकर हो जागे व्हा"


सावधान व्हा सांगलीकर  ...एक जन आंदोलन उभं करा...


सलीम नदाफ: संपादक ; लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड.
8830247886