आपत्तीत स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज..जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी*

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आपत्तीत स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज..जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी*



लोकसंदेश न्यूज नेटवर्क

संभाव्य आपत्तीत स्थानिकांच्या
सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज...
:: जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

भूस्लखनाचा धोका असणाऱ्या मिरूखेवाडी, कोकणेवाडीची पाहणी

सांगली, दि.: संभाव्य आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या अनुषंगाने स्थानिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहावे. पावसाचा वाढता जोर पाहता स्थानिकांनीही याबाबत तात्काळ माहिती द्यावी व प्रशासनास सहकार्य करावे. प्रशासन सर्व उपाययोजनांसाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी केले.

शिराळा तालुक्यातील भूस्खलन सदृश्य परिस्थिती असणाऱ्या मिरूखेवाडी व कोकणेवाडी गावातील संभाव्य धोका टाळण्यासाठी व गरज पडल्यास या भागातील लोकांचे स्थलांतराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दोन्ही गावात पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच, लोकप्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ व प्रशासकीय यंत्रणा यांची बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.


यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, जिल्हा बँक संचालक सत्यजीत देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक उपवनसंरक्षक नीता कट्टे, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उमेश पोटे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, सहाय्यक उपवनसंरक्षक अजितकुमार साजणे, तहसिलदार शामला खोत पाटील, गटविकास अधिकारी संतोष राऊत, विभागीय वन अधिकारी श्री. काळे, माजी सभापती हणमंतराव पाटील, विश्वास कारखान्याचे संचालक विराज नाईक आदि उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायतनिहाय दिलेल्या साहित्यांचे विकेंद्रीकरण करण्याच्या सूचना देऊन डॉ. राजा दयानिधी म्हणाले, मणदूर, आरळा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या वाड्यांवरती टॉर्च, रोप, लाईफ जॅकेट आदिंची अतिरीक्त मागणी करून ठेवावी. जिल्हा प्रशासनाकडून गरजेवेळी बचाव साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संपूर्ण पुनर्वसनाच्या ग्रामस्थांच्या मागणीसंदर्भात आगामी 15 ऑगस्टच्या ग्रामसभेच्या ठरावाच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी सूचनेनुसार आपत्ती काळात करावयाच्या कृतीबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणानकडून मिरूखेवाडी येथे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच संबंधित वाड्यावर 5 ते 10 लोकांचा सक्रिय चमू तयार ठेवणेसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी यावेळी ग्रामस्थांना सूचना केल्या.
डॉ. राजा दयानिधी म्हणाले, पश्चिम भागातील वाड्यांवर रेंज नसल्यामुळे प्रशासनाचा या वाड्यांशी असणारा संपर्क तुटतो. या पार्श्वभूमिवर तालुका प्रशासनाने संबंधित वाड्या - वस्त्यांवरील लोकांना सॅटेलाईट फोनचे प्रशिक्षण द्यावे. संबंधित वाड्यांवर सॅटेलाईट फोन ठेवण्यासंदर्भात त्यांनी तहसिलदार यांना सूचित केले.
वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीसंदर्भातही डॉ. राजा दयानिधी यांनी आढावा घेतला. वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान थांबविण्यासाठी कायम स्वरूपी ठोस उपाय योजनांतर्गत नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून चर खुदाई, कंपाउंड फेन्सिंग, कुरण विकास करणे, चारा पिकांची लागवड करणे, व्याघ्र संरक्षण आराखड्यात तशी नोंद घेणे आदि सूचना त्यांनी यावेळी केल्या.

तसेच, वनविभागाच्या विविध योजनांचा फायदा मिळणेसाठी ग्रामविकास समितीची स्थापना करावी व पाच वर्षांचा आराखडा सादर करावा. तसेच सदर समितीच्या माध्यमातून गावातील खाजगी वाहन धारकांना, महिला बचत गटाना रोजगार उपलब्ध करावा. समितीच्या माध्यमातून सोलार कुंपनाची मागणी करावी, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी प्रकल्पग्रस्त व पुनर्वसनग्रस्तांचे प्रश्न, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना आदिंबाबत मत मांडले. सत्यजीत देशमुख यांनी खुंदलापूर धनगरवाडा गावात ग्रामस्थांनी स्थलांतर न करण्याचा निर्णय घेतल्याने आवश्यक कार्यवाही करून सोयी सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी केली. मणदूरच्या सरपंच शोभा माने, चांदोलीचे वन अधिकारी गणेश पाटोळे, चांदोली वन क्षेत्रपाल नंदकुमार नलावडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.