LOKSANDESH NEWS
धर्मांध लोकांच्या बोलण्याने देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही - कपिल पाटील
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास जोरात सुरू असून, काही जण मुद्दाम त्यांना बदनाम करत आहेत. त्यामुळे धर्मांध लोकांच्या बोलण्याने देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही, असे स्पष्ट मत भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आणि ठाणे महापालिकेच्या सहकार्याने मानाची ७२ वी पुरुष श्री कृष्ण करंडक व महिला गटासाठी स्व. पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा-२०२५ ठाण्यात सुरू झाली आहे. ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील जे. के. केमिकल कंपनीच्या आवारात स्व. अटल बिहारी वाजपेयी क्रीडा नगरीत मातीच्या सहा क्रीडांगणांवर कबड्डीचा थरार सुरू आहे. या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कपिल पाटील यांनी स्पर्धेला भेट दिली. तसेच यावेळी कपिल पाटील यांनी आयोजकांसह खेळाडूंचे देखील कौतुक केले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्तुत्वान असून राज्याच्या विकासात सर्वाधिक योगदान फडणवीस यांनी दिले आहे. आम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री आम्ही कधीच पाहिला नाही, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर सगळ्यांना समान वागणूक, सगळ्यांना समान फंड देण्याचे काम आतापर्यंत होत आहे. खऱ्या अर्थाने विकासाला चालना देण्याचं काम फडणवीस यांनी केले असल्याने ते कधीच बदनाम होऊ शकत नाही असे पाटील यांनी सांगितले.