शैक्षणिक परिवर्तनात सकारात्मकतेने सहभागी व्हा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर
शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे विविध उपक्रमातील स्पर्धाच्या पुरस्काराचे वितरण
देशाची भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून, शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षणासोबतच नैतिक मूल्याची सांगड घालणे काळाची गरज आहे. खाजगी शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण हे एकच परिमाण आहे. गुणवत्तापूर्ण, तंत्रस्नेही व मूल्याधिष्ठित शिक्षण हाच परिवर्तनाचा मूलमंत्र आहे. शिक्षकांनी या शैक्षणिक परिवर्तनात सकारात्मकतेने सहभागी व्हावे असे आवाहन राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
आज जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था येथे विविध उपक्रम व स्पर्धाच्या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., शिक्षणाधिकारी (माध्यमिक) मनिषा भंडग, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नितू गावंडे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे उपस्थित होते.
शासकीय शाळा बंद होऊन खाजगीकरण होण्याची शिक्षकांच्या मनात असलेली भीती शिक्षकांनी दूर करुन केंद्र व राज्य शासन शासकीय शाळाच्या शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी मोठी गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे शासकीय शाळा बंद होणार नाही,
अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी देऊन, यासाठी शिक्षकांनी खाजगी शाळेच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण पध्दती अवलंबून गुणवत्ता पूर्ण व वैज्ञानिक शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा. वर्धा जिल्ह्यातील शाळांचा दर्जा कसा वाढविता येईल व राज्यात वर्धा जिल्ह्याचे शिक्षण क्षेत्रात नाव लौकिक करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे, असेही डॉ. पंकज भोयर म्हणाले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली