बौद्धगया महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूरमध्ये भव्य शांतता मोर्चा
बिहारमधील जागतिक वारसा असलेल्या बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी आज चंद्रपूर शहरात भव्य शांतता मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चाचे आयोजन समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच आंबेडकर चळवळीतील विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय संघटनांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
बौद्धगया महाविहार हे बौद्ध धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र असूनही ते हिंदू व्यवस्थापनाच्या नियंत्रणात आहे, ही गोष्ट अन्यायकारक आहे, असे मत आंदोलनाचे संयोजक प्रवीण खोब्रागडे यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, महाविहार बौद्धांच्या नियंत्रणात यावा, ही केवळ धार्मिक भावना नाही, तर बौद्ध समाजाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. भारतीय भिक्खू संघाने १२ फेब्रुवारीपासून देशभरात या मागणीसाठी चळवळ सुरू केली आहे.
या शांततामय मोर्चात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार, बौद्ध मंडळे व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मोर्चात सहभागी नागरिक छत्र्या, पाण्याच्या बाटल्या व स्कार्फसह उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली