इस्लामपूर मध्ये शेतकरी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण
महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नाहीत. निसर्गाच्या अवकृपेने त्रस्त झालेला शेतकरी आज आत्महत्या करण्याच्या मार्गावर उभा आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेली आश्वासने तातडीने पूर्ण करावीत, या मागणीसाठी आज इस्लामपूर येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
शेतकऱ्यांनी गावाकडून आणलेली भाजी-भाकरी खाऊन तहसीलदार सतीश पाटील यांच्या केबिनसमोर शांततापूर्ण आंदोलन केले. या वेळी पुढील मागण्या सरकारपर्यंत पोहोचवून त्या मान्य कराव्यात, अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली. शेतकऱ्यांचे संपूर्ण शेती पिक कर्ज माफी करण्यात यावी. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास अखंड वीजपुरवठा करण्यात यावा. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखानदारांकडून थकलेली ऊस बिले 15% व्याजासह मिळावीत. सोयाबीनला प्रति क्विंटल 6000 रुपये व कांद्याला प्रति क्विंटल 4000 रुपये दर द्यावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या आंदोलनात शेतकरी लालासो पाटील, बजरंग भोसले, तानाजी जगताप, दिनकर पाटील, जयवंत पाटील, सुनील सावंत, हनुमंत पाटील,अरुण गावडे, संदीप फार्ने, आनंदराव डाळे, राकेश भोसले, सचिन पाटील, लालासो धुमाळ, संदीप पाटोळे, सुनील फुलारे, अरविंद जगताप, महेश जगताप,संभाजी पाटील,संतोष निकम,दत्ता बाबर, गणेश पाटील, मोहसीन पटवेकर, जितू सूर्यवशी, सर्फराज डाके,निलेश देवर्डे,उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली