पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने घेतलेल्या कठोर भूमिकेनुसार भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत जोरदार कारवाई करत दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. या एअर स्ट्राईकमुळे आपल्या माथ्यावरचं कुंकू गमावलेल्या भगिनींना खरी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "पहलगाम हल्ल्यात अनेक महिला भगिनींनी आपल्या माथ्यावरचं कुंकू गमावलं होतं.
'ऑपरेशन सिंदूर'द्वारे भारताने या भगिनींना खरी श्रद्धांजली दिली आहे. पाकिस्तान नेहमी अशा भ्याड कृती करतो, मात्र भारत त्याला प्रत्येकवेळी ताकदीनं प्रत्युत्तर देईल. देशातील सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत आणि संपूर्ण देश यावेळी एकवटलेला आहे. यावर कायमचा ब्रेक लागावा यासाठी केंद्र सरकारकडून निश्चितच दीर्घकालीन उपाययोजना तयार केल्या जात असतील." या कारवाईनंतर देशातील राजकीय पक्षांनी एकजुटीने केंद्र सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला. जागतिक स्तरावरही अनेक देशांनी भारताच्या कारवाईचं समर्थन करत दहशतवादाविरोधातील भूमिकेचं कौतुक केलं आहे. 'ऑपरेशन सिंदूर' ही केवळ सैन्य कारवाई नसून, शहीदांच्या बलिदानाला आणि देशाच्या अस्मितेला दिलेली कृतज्ञतेची सलामी मानली जात आहे.