वडीलोपार्जीत शेत-जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी देण्यास शेतकऱ्यांचा विरोध
तालुक्यातील मौजे आडवण व पारदेवी येथील वडीलोपार्जीत शेत जमिनी औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांचा विरोध आहे. जमीन संपादीत करू नये यासाठी माजी आमदार पांडुरंग गांगड, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ व शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. मोर्चा नंतर शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडून जोरदार आंदोलन केले.
शासनाने इगतपुरी तालुक्यात अनेक प्रकल्प आणुन शेतकऱ्यांना भूमीहीन करण्याचे काम केले आहे असा आरोप माजी आमदार पांडुरंग गांगड यांनी केला. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ यांनी बोलतांना सांगितले की, या आधीच अनेक प्रकल्प तालुक्यात असतांना शासन पुन्हा औद्योगिक वसाहतीचा घाट घालत आहे. जर शेतकरी भुमीहीन झाला तर नागरिक काय कंपन्या खातील का असा प्रश्न उपस्थित केला. तालुक्यात रेल्वे, मुंबई नागपुर समृद्धी महामार्ग, अनेक धरणे, डिझेल पेट्रोल लाईन, राष्ट्रीय महामार्ग यासाठी जवळपास शासनाने ८० टक्के जमीनी संपादीत केल्या आहेत. आता तरी शेतकऱ्यांना भूमीहीन करू नका. अन्यथा शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन सुरू केले जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे नेते बाळासाहेब धुमाळ यांनी दिला.
शेतकरी आता आक्रमक झाले असून आता जमीनींची मोजणी करू नये यासाठी आता शेतकरी एकवटले आहेत. आमच्या जमीनीच्या ७/१२ वर घेतलेल्या नोंदी रद्द करून कमी करण्यात याव्यात यासाठी तहसील कार्यालयात जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांनी यावेळी केली. तसेच शासनाने जमीन मोजणी त्वरीत थांबवुन ७१२ वर घेतलेल्या नोंदी तत्काळ रद्द करण्यात आल्या पाहिजे. अन्यथा तहसील कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती गाव बचाव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोकणे व उपाध्यक्ष विष्णु कोकणे यांनी दिली.