शहरातील समस्या मार्गी न लागल्यास पालिकेला ठोकणार कुलूपशिवसेना (उबाठा) चा इशारा
गोंदिया नगर परिषदेत प्रशासकीय यंत्रणेचा कारभार आहे. या कार्यप्रणालीने शहर स्वच्छतेसह विकासाचा बोजवारा उडाला आहे. अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. मात्र या समस्यांना घेवून प्रशासकीय यंत्रणा गंभीर नसल्याने शहरवासीयांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या सात दिवसात समस्या मार्गी लावण्यात यावा, अन्यथा पालीकेला कुलूप ठोकणार, असा इशारा आयोजित पत्र परिषदेच शिवसेना (उबाठा) गटाचे युवा सेना जिल्हा अध्यक्ष हरिश तुळसकर यांनी दिला आहे.
शहरवासीयांकडून शैक्षणिक, वृक्ष, स्वच्छता असे विविध कर आकारण्यात येतात. मात्र शहरवासी या लाभापासूनही वंचित आहेत. घरकुल योजनेची किस्त लाभार्थ्यांना मिळालेली नाही, पालिके अधिनस्त अनेक शाळा बंद आहेत, तर दुसरीकडे खाजगी शाळांना परवानगी देण्यात येत आहे. माता रमाई योजने अंतर्गत लाभार्थी लाभापासून वंचित आहेत. शिवाय जुनी इमारत नष्ट करून नवीन इमारत बांधकामासाठी आलेला 30 कोटीचा निधी पडून आहे. तेव्हा पालिकेचे बांधकाम त्वरित करण्यात यावे, स्वच्छता व कचरा गाडीच्या टेंडरमध्ये व वजनकाट्यामध्ये होणारी हेरफेर थांबविण्यात यावी, मान्सूनपुर्व स्वच्छता अभियान राबविण्यात यावा, शहरात अवैध होर्डिंग लावणार्यांवर कारवाई करण्यात यावी अश्या विविध समस्या आवासून उभ्या आहेत. या बाबत शिवसेना (उबाठा) गटाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देण्यात आले मात्र त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी या समस्या त्वरित मार्गी लावण्यात याव्या, अन्यथा नगर परिषदेला कुलूप ठोकणार असा इशारा या वेळी देण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली