LOKSANDESH NEWS
"आमचं घर गेलं, आम्हाला घर द्या", कल्याण पूर्वेतील इमारत दुर्घटनेतील पीडित कुटुंबियांचा पालिकेवर हल्लाबोल
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात घडलेल्या भीषण इमारत दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित कुटुंबांनी आज महापालिकेवर मोर्चा काढला. तात्पुरत्या निवाऱ्याऐवजी कायमस्वरूपी राहण्याची सोय करून द्यावी, अशी त्यांनी जोरदार मागणी केली. 40 वर्षे जुनी असलेल्या सप्तशृंगी को-ऑप. हाऊसिंग सोसायटीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, अनेक वर्षांचा संसार एका क्षणात उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबियांच्या वेदना आता प्रशासनासमोर न्यायाच्या आक्रोशात उमटत आहेत.
कल्याण पूर्वेतील चिकणीपाडा परिसरात असलेल्या 40 वर्षे जुन्या सप्तशृंगी को-ऑप. हाऊसिंग सोसायटीमधील एका चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सहा जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या इमारतीत राहत असलेल्या अनेक कुटुंबांचे संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले. "आमच्या घरात तिसरा आहे, तिसरा असताना कोणी बाहेर पडत नाही, मात्र आम्ही बाहेर पडलोय — आम्हाला न्याय द्या," अशी भावनिक मागणी करत या पीडितांनी आज महापालिकेवर मोर्चा काढला. "पाच मिनिटात संसार बाहेर काढायची परवानगी दिली, पण आम्ही फक्त कागदपत्रं आणि थोडे पैसेच वाचवू शकलो," असं सांगत त्यांनी त्यांच्या वेदना मांडल्या. महापालिकेने या कुटुंबीयांसाठी तात्पुरत्या स्वरूपात एका शाळेत निवाऱ्याची सोय केली असली, तरी तेथून पुढे काय, हा प्रश्न कायम आहे. याच चिंतेतून आज हातात बॅनर घेत या कुटुंबीयांनी पालिकेला निवेदन दिलं आणि कायमस्वरूपी पुनर्वसनाची मागणी केली. या दुर्घटनेने पुन्हा एकदा जुन्या, धोकादायक इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाची जबाबदारी अधोरेखित होत आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी सर्वत्र मागणी होत आहे.