मान्सून पूर्व पावसाने कांद्याचा झाला चिखल; शेतकरी हतबल
महाराष्ट्रात यंदा वेळेच्या तब्बल बारा दिवस आधीच, म्हणजेच 25 मे रोजीच मान्सून जोरदारपणे दाखल झालाय. रस्ते जलमय झाले, शहर थोडावेळ थांबले, पण खऱ्या अर्थाने थांबला तो ग्रामीण भागातला शेतकरी! अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले-संगमनेर तालुक्यात देखील कांदा शेतातच सडून चालल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय.
शहरातल्या लोकांसाठी हा पाऊस क्षणिक आनंद देणारा ठरला, पण शेतकऱ्यांच्या डोक्यावर मात्र नव्याने संकट कोसळले. एप्रिलच्या अवकाळी पावसानं आधीच शेतकऱ्यांचं नुकसान केलं होतं, त्यावर वेळेआधीच आलेल्या मान्सूननं पुरते पानं उडवली. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर आणि अकोले तालुक्यात या पावसाचा जबरदस्त फटका बसलाय. पावसाने उघड पडत नसल्यामुळे शेतामध्येच साठवून ठेवलेला कांदा सडून जात आहे. ग्रामीण भागात साठवणुकीच्या योग्य सोयी नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. पावसामुळे कांदा शेतातच खराब झाला असून अद्याप पर्यंत पंचनामाही झालेला नाही. एकरी कांदा लागवडीसाठी आलेला खर्च सुद्धा सुटत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करताय.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.